आधुनिक मराठी कथेचं आजचं सर्वसाधारण वय एका शतकाचं आहे असं मानायला हरकत नाही. मराठी ‘कथा’ अतिशय सशक्त आणि अत्यंत प्रयोगशील राहात आली आहे. १९६० नंतरच्या कथांचा एक महत्त्वाचा भाग असा की, ह्या कथा केवळ गोष्टीरूपात राहिलेच्या नसून तिला अनेक पैलू प्राप्त झाले आहेत.
“रंगश्वास” ह्या प्रयोगात ज्या कथांचा उल्लेख केला आहे, त्यात अनेक घटना घडत आहेत. या कथांमध्ये एक निश्चित स्थळ, निश्चित आवाज, निश्चित भूमिका आहेत. या कथांमधली प्रयोगशीलता तर मोठी आहेच, पण जीवनाला थेट आणि तडक जाऊन भिडण्याची त्यातली नाट्यात्मकता (dramatic element) तसेच दृश्यात्मकता (visuality) थक्क करणारी आहे.
“रंगश्वास” प्रयोगात ज्या कथांचा उल्लेख केला आहे, त्या कथांनी महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या मराठी वाचकांच्या मनात स्वतःचं एक पक्कं स्थान निर्माण केलं आहे यात शंकाच नाही.
या कथांना, त्यातील पात्रांना, घटनांना आणि संवादांना रंगमंचावर आणून श्री विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाखाली जिलेबी आर्टस् (बॉस्टन) संस्थेने एक विलक्षण ताकदीची निर्मिती घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. नाट्य रूपात सादर केलेल्या या कथेतील पात्रांना शरीर आणि आवाज मिळाल्यामुळे, ती पात्रे रसिकांशी थेट संवाद करतात .या कथा आज छापील अक्षरांतून श्वास घेताहेत, त्यांना जिलेबी आर्टस् संस्थेने रंगश्वास बहाल केला आहे!
कथांचं नाट्यरुपांतर करून त्यांचा रंगमंचीय प्रयोग सादर करून या कथांना नवा चेहरा, नवी ओळख या प्रयोगाद्वारे देऊया.